पृष्ठे

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

श्रमदान हेच श्रेष्ठदान




 श्रमदान हेच श्रेष्ठदान 

      गाडीच्या डिक्कीतला गेरू म्हणजे हिरमुंजीची 2 किलोची पॕकिंग बाजूला ठेवली.दुपारच्या सुट्टीत पाणी भरलेल्या बादलीत गेरू मिसळला अन् सुरूवात केली झाडांना द्यायला.चौथीची मुलं सकाळपासूनच निरीक्षण करत होती.सभोवती जमली.

"ओ सर,आम्ही देतो ना रंग.तुम्ही नका देऊ.." करण बोलला.

"सर,जाऊ द्या.किचनमध्ये आजून एक ब्रश आहे.तुम्ही पण द्या आम्ही पण देतो." राज शक्कल लढवत बोलला.

त्यात समर्थ,यश,मयुरही आपापली मतं सांगत होती.

      पोरांनी सोबतीने श्रमदान करण्यास सुरूवात केली.झाडांना कीड लागू नये व सुशोभित शाळा दिसावी म्हणून प्रवास सुरू झाला होता.त्यात परिसरात पडलेल्या दगडांना झाडांभोवती लावून रंग देण्याची आयडिया पोरांच्या डोक्यात आली.पहिलीपासून चौथीपर्यंतच्या मुलांनी परिसरातील लहान मोठी दगडी झाडांभोवती लावली.तिसरीच्या मुलांनी झाडांना खत दिले अन् चौथीच्या मुलांनी झाडांना,दगडांना रंग दिला.दररोज काही वेळ श्रमदान केल्याने काही दिवसातच हाती घेतलेले काम पूर्ण झाले.मुलांच्या सोबतीने शाळेचे बाह्यांग रूप बदललेय.ती बोलकी झालीय.लावलेली झाडं भाव खाताय.

       मुलांच्या कल्पकतेचं स्वागत झालं अन् शाळा नटलीय.श्रमदानाचं महत्त्व यानिमित्तानं पटवून देता आले.

      'गुणवत्ता हेच प्राथमिक लक्ष्य' ठेवल्याने सारे जमून येतेय.प्रयत्न सुरू आहेत लेकरांच्या मदतीने.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!



शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

शेकोटी गप्पा

 






शेकोटी गप्पा

      शाळेत अनौपचारिक शिक्षण खूप महत्वाचे असते.औपचारिक शिक्षणाला फाटा देत दप्तरमुक्त शनिवार अन् सुरू असलेला गुलाबी थंडीचा हिवाळा ऋतू आल्हाददायकच असतो सर्वांसाठी.सकाळी सकाळी भेटलेली मुलं जीवनाला रंग भरून जातात.

       आज मुलांशी गप्पा झाल्यात.शेकोटी,वाजणारी थंडी त्यात अधूनमधून कचरा गोळा करून आणणारी मुलं गुलाबी थंडीची ऊब देत होते.मुलांशी कुटुंब,शेती,मामाचं गाव,शेती,डोंगर,नद्या,शाळा या विषयावर जिकडे गप्पांचा कल जाईल तिकडे गप्पा सुरू ठेवल्या.आपल्या जगातल्या गोष्टी मुलं मोठी माणसं बनून सांगतात जेव्हा त्यांचं कुणी ऐकणारं असतं.

कधी कधी आपणही 'कान' व्हावं मुलांचा...!

       "सर! आपलं ऐकतात." ही भावनाच मुलांना आपलंस करण्यात मोलाची भूमिका निभावून जात असते.अनौपचारिक शेकोटी गप्पांतून न बोलणारी,मागे राहणारी मुलं आपला मार्ग काढत आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करतातच अन् येथूनच खरी शिक्षण वाट सुरू होते त्यांची.

       नव नवे शालेय उपयुक्त उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचा मुळातच उद्देश तो असतो,की शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिक्षण प्रवाहात आणून,तो टिकवून त्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे होय.माळीनगर शाळा सातत्याने तेच करत आलीय अन् करत राहणार.कारण शाळेत येणारं प्रत्येक मुलं महत्त्वाचं आहे.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

महात्मा फुले प्रेरणा कट्टा

 




महात्मा फुले प्रेरणा कट्टा

          'अभ्यासाचं झाड' या संकल्पनेतून अडगळीत पडलेला टेबल झाडाखाली ठेवल्यास त्यावर अभ्यास,गप्पा,वाचन,लेखन करता येईल या उद्देशाने माळीनगर शाळेत आजपासून 'महात्मा फुले प्रेरणा कट्टा' विद्यार्थ्यांकडून स्थापन करण्यात आला.

      विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत आपली संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी वर्गातला टेबल स्वच्छ केला.त्यास मिळून सर्वांनी रंग दिला.वाचन कट्टा नाव ठरवणे,झाड निश्चित करत टेबल ठेवण्याची जागा,पाणी मारणे,रांगोळी काढणे,त्यावर मिळून बसण्याचं नियोजन झालं अन् प्रत्यक्षात आज महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रत्यक्षात उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील पुस्तके वाचन करत महामानवास अभिवादन केले.

       विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला हा 'महात्मा फुले प्रेरणा कट्टा' निश्चितच माळीनगर शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरिता दिशादायी ठरेल.

        चिमुकल्यांनी महामानवास केलेले अभिवादन प्रेरणादायीच..!

प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!


शनिवार, २६ नोव्हेंबर, २०२२

व्हर्च्युअल ट्रीप विथ एक्सपर्ट



 व्हर्च्युअल ट्रीप विथ एक्सपर्ट


        दुपारचं सत्रात LFW - LeapforWord : English Literacy programme च्या मुंबईस्थित एक्सपर्ट तेजल यांच्याशी माळीनगरच्या विद्यार्थ्यांनी व्हर्च्युअल ट्रीप व्दारे संवाद साधला.प्रेरणा अभियानात इंग्रजीविषयक अनेक उपक्रमांचा सहभाग केला गेला असल्याने माळीनगर शाळेत LFW चे कामकाज कसे सुरू आहे.विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्याच्या उद्देशाने आनंददायी ट्रीप झाली.

        नियमित पाठविला जाणारा अभ्यास,त्याचा होणारा उपयोग एक्सपर्ट तेजल यांनी जाणून घेतला.यात विद्यार्थ्यांनी इंग्रजी वाचन,शब्दडोंगर,स्पेलिंग लेखन,वाचन,वाक्य बनविणे,स्वर,व्यंजन,इंग्रजी बाराखडी विषयक अनेक उपयुक्त ॲक्टीव्हिटीज  सादर केल्या.तेजल यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांची प्रगती जाणून घेत विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयक असणाऱ्या समज विषयी कौतुक केले.त्यांना नवनव्या टीप्स देत सहजरित्या आपण अभ्यास करावा असा संदेश दिला.

"मुलांनो,तुम्ही LFW चा फारच छान उपयोग करून घेत आहात.तुम्ही खूप तयारी केलीय.मी तुम्हांला नॕशनल लेवल चॕम्पियनशिपकरिता निमंत्रित करते.जेथे अनेक राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग असेल.याल ना..!"

       माळीनगर शाळा राबवत असलेल्या इंग्रजी विषयक उपक्रमांतील सातत्याचं हे यश आहे.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या.!

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

तंत्रस्नेही रचनामय दिवाळी

 🎉🎊🎇🎆🎉🎊🎇🎆🎉🎊


तंत्रस्नेही रचनावादी दिवाळी

         प्रथम सत्रातला शेवटचा दिवस,दिवाळीच्या लागणाऱ्या सुट्या अन् मुख्याध्यापक बधान सरांचा सेवेचा प्रत्यक्ष शाळा सुरू असतांनाचा शेवटचा दिवस अशा मिश्र स्वरूपात असलेला दिवस जरी असला तरी विद्यार्थ्यांनी मोबाईल,कम्प्युटर,परिसरात असलेली साधने यांचा उपयोग करत,समुहात विभागणी करत रचनामय दिवाळी साजरी केली.

       दिवाळीचा उत्सव माहिती,अक्षरे,शब्दडोंगर,वाक्ये,शब्दसाखळी अशा एक ना अनेक बाबी तोंडी घेत दिवाळीचा उत्साह जागा ठेवला.

       आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा..!

🎉🎊🎇🎆🎉🎉🎇🎆🎉🎊






रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२

कवी आपल्या भेटीला - राजेंद्र उगले

 कवी आपल्या भेटीला

'थांब ना रे ढगोबा - राजेंद्र उगले'

      दप्तरमुक्त शनिवार आणि मुक्त वाचन माळीनगर शाळेचे ठरलेले उपक्रम.आज मुलांनी आपल्या ग्रंथालयातून पुस्तक काढले होते,बालसाहित्यिक राजेंद्र उगले लिखित 'थांब ना रे ढगोबा' हे बाल कवितांचं पुस्तक.आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचून झाल्यावर समुहात वाचन या उद्देशाने मुलांनी एकमेकांना या पुस्तकातील कविता वाचून दाखवल्या.गायन केल्या.नव नवे विषय असल्याने त्यांना ते आवडू लागलेही.

          मस्त रंगीत मोठमोठी चित्रे लहानग्यांनाही आकर्षित करत होती.सहज सोप्या रचना त्यांना समजत होत्या.तशातच कवींच्या भेटीला जावं म्हणून मुलांना प्रत्यक्ष कवी राजेंद्र उगले यांच्याशी संपर्क करून दिला.कॉलवर कवी अन् मुलं यात हौणारा संवाद आनंददायी होता.

          मुलांनी यावेळी कवींच्या कविता त्यांना आपल्या सुरात ऐकवल्या.आजचा उपक्रम सांगितला.मुलांशी कवी उगले मनसोक्त बोलले.मुलांच्या आवाजातील कवितांना त्यांनीही दाद दिली. कवितांचा प्रवास,सतत वाचन,लेखनाचा संदेश यावेळी बालसाहित्यिक राजेंद्र उगले यांनी मुलांना दिला.

       ज्यांचं पुस्तक वाचतोय त्यांच्याशी बोलायला भेटलं याचाच आनंद मुलांना फार झाला होता.काही मुलांनी 'थांब ना रे ढगोबा' हा बालकविता संग्रह घरी नेऊन वाचला.एकमेकांना त्याबद्दल सांगितले.हे भारी झालं..!

प्रेरक आहात ..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!



मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

तंत्रस्नेही रचनावादी दसरा

 तंत्रस्नेही रचनावादी दसरा

दसरा हसरा व्हावा..!
शैक्षणिक दसरा साजरा करता यावा या उद्देशाने माळीनगर शाळेने तंत्रस्नेही रचनावादी दसरा साजरा केला..!

यात दसरा या सणाचे महत्त्व तोंडी घेण्यात आले.चित्र काढणे,रंगवणे,शुभेच्छा,शब्दडोंगर मराठी - इंग्रजी,परिसरातील खडे,पाने,फुले,मातीपासून HAPPY DASARA रचना,कम्प्युटरवर पेंटच्या सहाय्याने ग्रिटींग्ज,मोबाईलवर ब्लेंड कोलाजच्या सहाय्याने ग्रिटींग्ज तयार करणे,दसरा सणाचे स्वागत व नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणून गरबोत्सव साजरा करण्यात आला..!

विद्यार्थ्यांनी आपल्याला आवडणाऱ्या गृपमध्ये सामिल होत आपल्या कल्पकतेने तंत्रस्नेही रचनावादी दसरा साजरा केला.

प्रेरक आहात ..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!





सोमवार, ३ ऑक्टोबर, २०२२

ढगातलं जग

 "ढगातलं जग"


      मधल्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर वर्गाच्या दिशेने राहिलेली कामे आटपून घ्यावीत म्हणून निघालो.तेवढ्यात कोणीतरी हाताचं बोट पकडल्याचं लक्षात आलं.पाहतो तर पहिलीतली कावेरी होती.

"सर,आरतीभारतीला मारा.ती मला खूप बोलते आहे.मस्त बदडून काढा तिला." कावेरी मस्त गालातल्या गालात हसत हाताच्या बोटांशी खेळत खाली पाहू लागली.

"अरे बापरे! इतकं मारू तिला.अन् ती रडली तर...?" मी तिच्या सुरात सूर मिसळला.

"तुम्ही मारलं ना,मग ती माझं नावच घेणार नाही.तिला बोला तरी ओ सर...पहा ती आली बघा.कशी हसते आहे..." कावेरी जवळच आलेल्या भारतीकडे पाहत बोलू लागली.

     कावेरीचं सहज बोलणं आवडू लागलं होतं.मी काही बोलणार तेवढ्यात भारतीचा हात धरत कावेरीच म्हणाली,

"पाय वं भारती,तो ढग केवढा मोठा से..मजाना धवळा से ना...मस्त वाटी ना वं तेनावर गवूत तं..!"

    भारती ही तिला साद देऊ लागली.आता दोन्हीही आकाशातल्या ढगांचं निरीक्षण करू लागले होते.गप्पागोष्टी रंगत चालल्या पाहून मी ही त्यांच्यात पोहोचलो.

       मुली सहजच निळ्या निळ्या आकाशातल्या ढगांकडे पाहून आपल्या अनुभवातल्या वस्तू,प्राणी शोधू लागल्या होत्या.त्यांच्याशी बोलतोय म्हणून मैदानातली मुलं धावत आली.ती ही माना आकाशाकडे करत त्यांना दिसणारं,जाणवणारं बोलू लागली.ऋषिकेशला वाघ तर हर्षदला गाडी,सार्थकला गणपती दिसू लागला.कुणाला मारामारी करणारे दोन माणसं,अस्वलाचं तोंड असं बरच दिसू लागलं.मुलांचा आता घोळका झाला.

       सारेच निळ्या आकाशातील ढगात आपलं जगणं शोधत होते.आपल्या कल्पकतेने तिथे खेळायला जावं,उड्या माराव्यात,ढगांसोबत गप्पा माराव्यात,पाऊस कसा पडतो ते विचारावं,त्या थेंबासोबत खाली यावं असं मुलांच्या गप्पांतून जाणवत होतं.मुलांच्या सुरात सूर मिसळला गेल्याने मुलं आपल्या कल्पनेचा विस्तार करत होती.आपलं सर ऐकत आहेत म्हणून , "सर,हा ढग पहा.सर,माझा ढग आहे तो.सर,मेंढीचे कसे केस असतात तसे आहे ते..सर,ढगात शाळा भरवायची का?" सहज गप्पा ठोकत होती.

        सहज होणारं शिक्षण पाहून मजा येत होती.निरीक्षणातून मुलाचं अनौपचारिक बोलणं होत होतं.एकमेकांच्या हातात हात घालून, खांद्यावर हात ठेवून,डोके जवळ घेऊन आकाशाच्या दिशेने हात करून बोलणारी मुलं कुठलीही भिती न बाळगता बोलत होती.आपलं जग शोधत होती.त्याच्या जगातले नवनवे अनुभव ती मांडत होती.आनंद लुटणारी ही निरागस मुलं ढगातलं जग समजून घेत होती.

         मुलांचं सहज शिक्षण होत होतं.आपल्या भावना ते मांडत होते.मुलं कायम आनंदात असतात आणि ते आनंदात रहायचा प्रयत्न करतात.आपण फक्त निमित्त असतो.मुलाचं शिकणं हे ही असंच सहजच होत असतं.कावेरीचं भारतीविषयीचं मत सहजच कसं निरागसपणे बदललं अन् तिनेच ढगातलं जग आज मुलांना उपलब्ध करून दिलं.आपण फक्त सहजच त्यांचं जग समजून घेतलं आणि योग्य हसून प्रतिसाद दिला तर सारं वातावरणच प्रसन्न होऊन जातं.आनंददायी शिक्षण,सहज शिक्षण वेगळं काय असतं.शिकण्याच्या अनुभवात आनंद असायला हवा म्हणजे नवे मिळणारे अनुभव चांगले लक्षात राहतात.'रम्य ते बालपण' मुलांसोबत रमलं की आपल्यालाही अनुभवता येतं.अगदी मुलात मुल होऊन त्यांच्या मताला थोडा प्रतिसाद दिला तरी न बोलणारी मुलं आपोआप आपल्या विश्वास ठेवत बोलण्याचा प्रयत्न करतात.अनौपचारिक झालेलं आजचं 'ढगातलं जग' औपचारिक शिक्षणाचे वाक्य,शब्दडोंगर,माहिती,रंग,लपलेले शब्द,अक्षरे अशा कितीतरी छोट्या उपक्रमांना तोंडी जन्माला घालून गेले.

          मुलांचं 'ढगातलं जग' काही ऐकू आलं,जाणता आलं,समजता आलं.वर्गाच्या दिशेने जातांना आवारात आपल्या गटानुसार आपलं जग शोधणारी मुलं पाहून आनंद झाला.मुलांचं होणारं सहज शिक्षण आनंद देऊन गेलं होतं.कावेरीला पहावं म्हणून तिला शोधू लागलो.कावेरी अन् भारतीसोबत आता त्यांच्या मैत्रिणीही एकमेकांच्या खांद्यावर हात टेकून आकाशातील ढगांकडे हात दाखवत आपलं जग शोधत होती.एकमेकांना मनमोकळेपणाने हसून दाद देत होती.तिथे जाऊन कावेरीसोबत सेल्फी  घेतला.यशाची अनौपचारिक शिक्षणरूपी गप्पा नावाची नवी चावी आज मिळाली होती.सेल्फी विथ सक्सेसमुळे कावेरीला खूप आनंद झाला.सेल्फी घेतांना कमरेवर हात ठेवून विश्वासाने गळ्यात टाकून आत्मविश्वासाने पोज देणारी कावेरी धावत जाऊन पुन्हा भारतीसोबत ढगातलं जग शोधू लागली.

प्रेरक आहात..!

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या..!




रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

व्हर्च्युअल ट्रीप - कोठरे टू माळीनगर

 व्हर्च्युअल ट्रीप -कोठरे टू माळीनगर

       मुलांचं आनंददायी शिक्षण व्हावं, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणासाठी करून,मुलांची एकमेकांशी ओळख करून देतांना शैक्षणिक उपक्रमांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक कोठरे व माळीनगर यांनी शैक्षणिक व्हर्च्युअल ट्रीप आयोजित करून मुलांना नवी शैक्षणिक अनुभूती दिली.

        कोठरे येथील उपक्रमशील शिक्षक रवि वाघ यांनी या ट्रीपचे आयोजन केले.माळीनगर शाळेतील विद्यार्थी राबवत असलेले उपक्रम कोठरे येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले तर कोठरे येथील विद्यार्थ्यांचे उपक्रम माळीनगर येथील विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.एकमेकांशी बोलतांना मुलांना होणारा आनंद मुलांचा उत्साह वाढवत होता.कुतूहलाने माळीनगर शाळेची परसबागेची सफर,फुलझाडे यांची ओळख यावेळी करून देण्यात आली.

         शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हर्च्युअल ट्रीपचा अप्रत्यक्ष जरी अनुभव दिला तरी एकमेकांचे उपक्रम जाणून घेता येतात.नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कल्पकतेने करता येतो हे तेवढेच खरंय..!

        विद्यार्थ्यांना झालेला आनंद पाहून शैक्षणिक व्हर्च्युअल ट्रीपचा उद्देश सफल झाला.


प्रेरक आहात..!


प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या


शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

अंकुर

 
                    

अंकुर

       "सर,जामाचं रोप आणलंय,लावा ना शाळेमागे?" स्मित करत पहिलीतला कल्पेश हातातलं रोप दाखवत रस्त्याने जाणाऱ्या टु व्हीलर गाडीकडे पाहत बोलत होता.मी त्याच्याकडे बघत होतो.निरागस भाव अन् आपलं म्हणणं मांडण्याचं त्याचं कौशल्य भावलं.

         पहिलीतला कल्पेश अगदी लाजाळू अन् मितभाषी.आपल्या जगात वावरणारा.आज अगदी न लाजता शाळेत भरताच जवळ येत आत्मविश्वासाने आपलं हातातलं रोप दाखवत बोलून गेला.हातातलं जामचं रोप अन् त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून लगेचच त्यानं आणलेलं रोप लावून घ्यावं असं वाटलं.त्याचं नुसतं जवळ येणंच काही दिवसांपासून होणाऱ्या अनौपचारिक गप्पांचा परिणाम होता हे जाणवलं.मोठ्या मुलांना सोबत घेत शाळेमागे जातांना कल्पेशला विचारलं,

"कपू! का आणलं रं रोप ?"

"शाळा भारी होईल ना आपली.मस्त सावली भेटेल.जाम खायला भेटतील आपल्याला म्हणून .." कल्पेश बोलत होता.

        कल्पेशचे लहानसे बोल शैक्षणिक वाट सुकर करत होते.त्याच्या हृदयातून फुटलेले हे शब्दरुपी अंकुर जपणं गरजेचं होतं.मुलांना सोबत घेऊन शाळेमागे त्याच्या हाताने रोप लावलं.मुलांना एकत्र करत त्याच्या या कृतीचं कौतुक केलं.टाळ्या वाजवणाऱ्या मुलांकडे पाहत आपण काहीतरी वेगळं केलंय याची जाणीव त्याला झाली.खाली बसल्यावर कल्पेश आपल्या मित्राला म्हणाला,

"पाह्यं का? कशा टाळ्या वाजण्यात म्हनाकरता.तु पन एखादं झाडं आनजो घरून.आपली शाळा हिरवीगार हुयी जायी मंगन.."

       कल्पेशचा संवाद नवी जाणीव निर्माण करत होता.शाळेत झाडे लावा मोहिम असो की हँगिंग गार्डन मोहिम असो मुलांना सोबत घेऊन आम्ही प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देत असतो.यात श्रमप्रतिष्ठा,निसर्ग शिक्षण,पर्यावरण शिक्षण,मूल्यशिक्षण,जीवन कौशल्यांची रूजवणूक नित्याने होत असते.मोठी भावंडं कशी काम करतात,झाडे लावतात,रोपं आणतात,खत घालतात,झाडांची काळजी घेतात याचंच निरीक्षण कल्पेश करत होता.आपणही आपल्या शाळेसाठी खारीचा वाटा उचलावा असं त्याला वाटून गेलं असावं.तीन एच म्हणजे हँन्ड,हार्ट,हेडचा उपयोग करून घेणारी माळीनगर शाळा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नेहमीच अग्रेसर असते.मुलं अनुकरणातून शिकत असतात.आपल्याला काहीतरी करायचंय,शिकायचंय ही भावनाच मुलांमध्ये निर्माण करण्यावर आमचा भर असतो.निसर्गात मुलं अधिक शिकतात आणि येथेच ती संवेदनशील होतात यावर विश्वास असल्याने पर्यावरणीय शिक्षण हे प्रत्यक्ष अनुभवातून येथे दिलं जातं असतं.मुलांच्या अंकुररुपी कल्पनेला,कृतीला वाव देण्याचं काम नेहमीच करत असल्याने मुलं न घाबरता आपल्या मनात आलेल्या कल्पनेला सांगत असतात.

         मुल लहान असो की मोठे त्याच्याजवळ शहाणपण अन् वास्तवतेचे भान असते.मुलाला योग्यवेळी समज आल्यावर तो जबाबदारीने वागतो अन् जबाबदारी घ्यायलाही शिकतो.हे कल्पेशच्या कृतीने सिद्ध केले होते.मुलं ही जणू मोठी माणसेच असतात.हे ते करत असलेल्या कृतीतून आणि निरीक्षणातून आपल्याला नेहमीच जाणवत असते.खरं शिक्षण हे शिकवण्यात नाही,तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात असणाऱ्या अनौपचारिक नात्यातून बहरतं.हे तेवढंच खरंय.कल्पेशने आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचं उपयोजन केलं होतं.म्हणूनच तर शिक्षणतज्ज्ञ नील म्हणतो,"मुलाप्रमाणे शाळेने बदलायचे.मुलांना शिकायचेच असेल,तर ती कोणत्याही पद्धतीने शिकतात आणि जर त्यांना शिकायचेच नसेल तर ती शिकतच नाहीत."

         चला तर मग..! मुलांच्या विचारांचा आदर करत शिक्षण प्रवाहाचा गुणवत्तापूर्ण संवेदनशील मनांचा अंकुर जपूयात..!

- भरत विठ्ठल पाटील
9665911657
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर 
ता.मालेगाव जि.नाशिक 
bharatpatil7988@gmail.com



क्रीडा सप्ताह

 माळीनगर शाळेत क्रीडा सप्ताह संपन्न


खेळाने मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती वाढते : समाधान अहिरे

प्रेरणा अभियान अंतर्गत माळीनगर दुंधे शाळेत क्रीडा सप्ताह हा राबवला गेला.आदिवासी विकास पुणे येथील स्वीय सहाय्यक समाधान अहिरे यांच्या हस्ते याचा समारोप करण्यात आला.शालेय वयात भरपूर खेळा.आवडीचा खेळ हा छंद म्हणून जोपासा त्यामुळे आपली एकाग्रता तर वाढतेच पण आपल्यात खिलाडूवृत्तीही जोपासली जाते.खेळानेच मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्ती लाभते असे यावेळी अहिरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.


        शाळा स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करून मुलांचं खेळातून शिक्षण व्हावं,खेळाविषयी आवड निर्माण व्हावी,खेळाचं अनुकूल वातावरण तयार व्हावं,मुलांना शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावं म्हणून हा क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.यात लिंबू चमचा,गोणपाट स्पर्धा,धावणे,लंगडी,संगीत खुर्ची,क्रिकेट,फुगा खेळ,क्रिकेट,कबड्डी,कुस्ती,कॕरम,योगा,विविध विषयांचे माईंड  गेम  खेळवण्यात आले.विशेष मुलांच्या स्थानिक खेळानांही प्राधान्य देण्यात आले होते.यामुळे मुलांमध्ये नवा उत्साह व नवीन खेळ खेळल्याचा आनंद पहावयास मिळत होता.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास,इच्छाशक्ती,उत्साह व मेहनत दिसून आली.


       हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक राजेंद्र बधान व उपक्रमशील शिक्षक भरत पाटील,शाळा व्यवस्थापन समिती,पालकांनी बहुमोल योगदान दिले.